धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कॅन्टीन सेवांवर आंतरराष्ट्रीय संकटाचे सावट; कामगार अडचणीत
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
धाटाव औद्योगिक क्षेत्रात सध्या एक गंभीर व चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक कारखान्यांच्या कॅन्टीन सेवांवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे थेट परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेषतः आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, “पैसा आहे, पण गॅस नाही” अशी विचित्र अवस्था उद्योग परिसरात पाहायला मिळत आहे.
गॅस अभावी अनेक कॅन्टीनमध्ये स्वयंपाक व्यवस्थाच कोलमडली आहे. काही ठिकाणी चपाती पूर्णपणे बंद करण्यात आली असून, कामगारांना फक्त उपमा, पोहे किंवा शिरा यांसारख्या मर्यादित पदार्थांवर समाधान मानावे लागत आहे. तर काही कारखान्यांनी फक्त नाश्त्यावरच कॅन्टीन सेवा मर्यादित केली आहे. यामुळे कामगारांच्या दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे.
अनेक ठिकाणी दोन भाज्यांऐवजी एकच भाजी, तसेच ताक, दही यांसारखे पूरक पदार्थ पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. गॅस बचतीसाठी तळणाचे पदार्थही टाळले जात आहेत. काही कारखान्यांनी तर चुलीवर स्वयंपाक करण्याचा पर्याय स्वीकारला असला, तरी त्यातूनही नियमित आणि संतुलित आहार देणे कठीण ठरत आहे.
या परिस्थितीमुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “जेवणाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही घटले आहे,” अशी तक्रार अनेक कामगारांनी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी कॅन्टीन सेवा पूर्णपणे बंद होण्याच्या उंबरठ्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. उद्योग क्षेत्र आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही, मूलभूत सुविधा पुरवण्यात अडथळे निर्माण होत असल्याने कामगारांवर त्याचा थेट परिणाम होत आहे.
एकूणच, धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कॅन्टीन व्यवस्थेचे भवितव्य सध्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीवर अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे. आखाती देशांतील तणाव कधी निवळणार, याकडे उद्योगपती आणि हजारो कामगारांचे लक्ष लागून आहे. तोपर्यंत मात्र कामगारांना अपुऱ्या आणि असंतुलित आहारावर दिवस काढण्याची वेळ आली आहे.


