कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
शहर बचाव समितीचे नगरपरिषद प्रशासनाला स्मरणपत्र; पाणी, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता, गटार, भूमिगत वीज आणि आरोग्याच्या प्रश्नांवर ठोस कृती आराखड्याची मागणी!
प्रतिनिधी /गणेश पवार कर्जत
कर्जत शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवरून आता कर्जत शहर बचाव समितीने नगरपरिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
पाणीपुरवठ्यापासून वाहतूक कोंडीपर्यंत… स्वच्छतेपासून आरोग्य सुविधांपर्यंत… तब्बल ५० नागरी प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचा समितीचा दावा आहे.
शहरातील अनियमित आणि गढूळ पाणीपुरवठ्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, एक्स्प्रेस फिडर कार्यान्वित करावा, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता आणि नियमित पाणी तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी अधिकृत पार्किंग व्यवस्था, रिक्षा स्टँड, सिग्नल व्यवस्था आणि कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी समितीने केली आहे.
कचरा व्यवस्थापन, डंपिंग ग्राउंड, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, भूमिगत गटार, भूमिगत वीज, सीसीटीव्ही, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि नगरपरिषद प्रशासनातील पारदर्शकता अशा विविध प्रश्नांचाही स्मरणपत्रात समावेश आहे.
यापूर्वी निवेदने, बैठका आणि आंदोलन करून प्रशासनाकडून आश्वासने मिळाली. काही प्रश्न मार्गी लागले असले तरी अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्याप कायम असल्याचा आरोप समितीने केला आहे.
त्यामुळे आता प्रशासनाला थेट एक महिन्याची डेडलाइन देण्यात आली आहे. या कालावधीत ठोस कार्यवाही झाली नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा कर्जत शहर बचाव समितीने दिला आहे.
कर्जतकरांच्या ५० प्रश्नांवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.