शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
विद्यार्थिनींच्या व्हिडिओतून रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; वाहनांचे नुकसान, दुचाकीस्वारांच्या अपघाताचा धोका वाढला!
प्रतिनिधी /गणेश पवार कर्जत
कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, ‘रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ता?’ असा संतप्त सवाल वाहनचालकांसह ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत असून, त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पावसाळा सुरू होताच रस्त्यांवरील खड्ड्यांनी अधिकच उग्र रूप धारण केले आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांना अचानक ब्रेक लावणे, वाहन वळविणे अथवा खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करणे भाग पडते. अशावेळी वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता वाढते. खड्ड्यांमुळे टायर, चाके तसेच वाहनांच्या अन्य भागांचे नुकसान होत असून, नागरिकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
विद्यार्थिनींचा अनोखा ‘एल्गार….
या गंभीर समस्येकडे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी नेहा धारे, मानसी पवार, ज्योत्स्ना आदी शाळकरी विद्यार्थिनींनी कल्पकतेचा आधार घेत एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून कोंदिवडे रस्त्याची दयनीय अवस्था, जीवघेणे खड्डे आणि त्यातून निर्माण होणारा धोका प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या ‘जेएनजी’ आंदोलनाच्या धर्तीवर या शाळकरी ‘छोट्या जेएनजी’ विद्यार्थिनींनीही आपल्या परीने प्रशासन व लोकप्रतिनिधींना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. मोठ्यांकडून आपल्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जात असताना, या विद्यार्थिनींनी कोणताही आक्रस्ताळेपणा न करता कल्पकतेच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून आपला आवाज संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचविला आहे. त्यामुळे तालुक्यातील या ‘छोट्या जेएनजी’चे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
पाण्याखाली लपलेले खड्डे ठरताहेत धोकादायक
मुसळधार पावसात रस्त्यावर पाणी साचल्यानंतर खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग अधिकच धोकादायक बनतो. रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी गंभीर होते. समोरून येणारे वाहन, रस्त्यावर साचलेले पाणी आणि अचानक समोर येणारा खड्डा यामुळे दुचाकीस्वारांचा तोल जाण्याची शक्यता असते.
मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची वाट न पाहता संबंधित यंत्रणेने कोंदिवडे रस्त्याची तातडीने पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
तात्पुरती मलमपट्टी नको; कायमस्वरूपी डागडुजी करा,
‘खड्डे बुजवा, रस्ता सुरक्षित करा, असा स्पष्ट संदेश विद्यार्थिनींच्या व्हिडिओतून देण्यात आला आहे. केवळ पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये माती अथवा खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी रस्त्याची कायमस्वरूपी आणि दर्जेदार डागडुजी करण्यात यावी. तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता आणि त्यावर झालेल्या खर्चाचीही संबंधित यंत्रणांनी तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ग्रामस्थांची स्पष्ट मागणी….
तातडीने रस्त्याची पाहणी करा; धोकादायक खड्डे बुजवा, दर्जेदार डागडुजी करा आणि शाळकरी विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांचा प्रवास सुरक्षित करा, शासन–प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होणार का? शाळकरी विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेतून कोंदिवडे रस्त्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आता त्यांच्या या ‘छोट्या जेएनजी’च्या इशाऱ्याची शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कितपत दखल घेतात, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी करून तातडीने उपाययोजना करणार का? विद्यार्थिनींच्या या आवाजानंतर तरी कोंदिवडे रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजविले जाणार का? असे प्रश्न आता चव्हाट्यावर आले आहेत.
विद्यार्थिनींच्या या कल्पक उपक्रमामुळे रस्त्याचा प्रश्न केवळ कोंदिवडे गावापुरता मर्यादित न राहता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे या ‘छोट्या जेएनजी’च्या इशाऱ्यानंतर शासन–प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कोणती ठोस भूमिका घेतात, याकडे केवळ कोंदिवडे ग्रामस्थांचेच नव्हे, तर संपूर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे.