विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा रोह्यात तिरंगा रॅलीतून जागर; दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तसेच विद्यार्थ्यांच्या संघर्षातून मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी रोहा शहरात रविवारी तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवत, लोकशाही मूल्ये आणि संविधानिक अधिकारांच्या समर्थनाचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
दमखाडी येथील नवरत्न हॉटेल परिसरातून रॅलीला प्रारंभ झाला. विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागींच्या हातात तिरंगा असून देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅलीदरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे किंवा पक्षीय घोषणा देण्यात आल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा, संविधानिक मार्गाने झालेल्या संघर्षाचा आणि लोकशाही मूल्यांचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
रॅलीनंतर झालेल्या सभेत अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांच्या मनोगतामुळे उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. यावेळी कोमल गायकवाड, अदिती वाटवे, तसनीम म्हैस्कर यांच्यासह अन्य विद्यार्थी वक्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज व्यक्त केली. लोकशाहीत शांततामय आंदोलनाचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
तसेच हर्षद साळवी, राजेश काफरे, राजेंद्र जाधव, सौ. रोशन देशमुख आणि ओंकार गुरव यांनीही आपले विचार मांडत विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत गायन करून केली. शांतता, शिस्त आणि देशप्रेमाचा संदेश देणाऱ्या या तिरंगा रॅलीला रोह्यातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
.