खासदार श्री. सुनील तटकरे यांनी रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागण्यांची रेल्वे बोर्डाकडे केली जोरदार पाठपुरावा
रोहा | प्रतिनिधी (संतोष सातपुते)
रोहा रेल्वे प्रवासी समितीने मांडलेल्या विविध प्रलंबित मागण्यांची गंभीर दखल घेत खासदार श्री. सुनील तटकरे यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष श्री. सतीश कुमार यांना सविस्तर पत्र पाठवून या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यामुळे रोहा व कोकणातील हजारो रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.
खासदार तटकरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, रायगड लोकसभा मतदारसंघातील रोहा रेल्वे स्थानक हे औद्योगिक, व्यापारी व प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत उपलब्ध रेल्वे सेवा अपुऱ्या पडत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात रोहा रेल्वे प्रवासी समितीने सादर केलेल्या निवेदनाची प्रतही त्यांनी रेल्वे बोर्डाकडे पाठवली आहे.
खासदारांनी रेल्वे बोर्डाकडे पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
मच्छीगंधा एक्सप्रेस (गाडी क्र. १२६१९/१२६२०) ला रोहा स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात यावा.
रोहा–दिवा मेमू सेवांची संख्या वाढविण्यासाठी पेण–दिवा मेमू रेकचा वापर करण्यात यावा.
शनिवार व रविवारी वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रोहा स्थानकासाठी दोन अतिरिक्त मेमू रेक उपलब्ध करून विशेष सेवा सुरू करण्यात याव्यात.
रोहा रेल्वे स्थानकावरील सुविधा वाढवून रोहा–पनवेल उपनगरी रेल्वे मार्गाची क्षमता आणि प्रवासी संपर्क अधिक सक्षम करण्यात यावा.
रोहा रेल्वे प्रवासी समितीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, सध्या दुपारी १२.४५ ते सायंकाळी ६.३० या कालावधीत पनवेलकडून रोह्याकडे कोणतीही रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने तब्बल सहा तासांचा मोठा खंड पडतो. त्यामुळे मच्छीगंधा एक्सप्रेसला रोह्यात थांबा मिळाल्यास कोकणातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होईल.
तसेच, सध्या उपलब्ध असलेली रोहा–दिवा मेमू सेवा वाढत्या प्रवासी संख्येसाठी अपुरी असल्याने तिच्या फेऱ्या वाढविणे आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले आहे. आठवड्याच्या शेवटी कामानिमित्त, पर्यटनासाठी व इतर कारणांनी मोठ्या प्रमाणात प्रवास होत असल्याने अतिरिक्त मेमू सेवा सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्यास रोहा, रायगड व संपूर्ण कोकणातील रेल्वे प्रवाशांना अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.