मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांकडून पर्दाफाश; पाच गुन्ह्यांची उकल!
प्रतिनिधी /गणेश पवार
रायगड जिल्ह्यात मोबाईल टॉवरवरील बॅटऱ्या चोरून त्यातील शिसे विकणाऱ्या सराईत टोळीचा नेरळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत रायगड आणि नवी मुंबई परिसरातील एकूण पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, ४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील दामत येथील इंडस मोबाईल टॉवरवरील अमराज कंपनीचे २४ बॅटरी सेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड आणि नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, पोलीस उपनिरीक्षक सुशील काजरोळकर, पोहेकॉ. एस. एम. वाघमारे, पो.कॉ. आर. बी. केकान, व्ही. आर. वांगणेकर आणि ए. बी. बेन्द्रे यांच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रबीउलइस्लाम तमजुलइस्लाम शेख (वय ४५, रा. शिवडी, मुंबई) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
पुढील तपासात आरोपीचे साथीदार सोनू, आवेस आणि चिनीदादा (रा. शिवाजीनगर, मुंबई) यांची नावे समोर आली. तसेच चोरीतील बॅटऱ्या भंगार व्यावसायिक ऋषभ धनराज जैन याला विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
या तपासादरम्यान नेरळ, खालापूर, पेण, दादरसागरी आणि नवीन पनवेल पोलीस ठाण्यांतील एकूण पाच गुन्ह्यांची उकल करण्यात नेरळ पोलिसांना यश आले. यामध्ये रायगड जिल्ह्यातील चार आणि नवी मुंबईतील एका गुन्ह्याचा समावेश आहे.
कारवाईदरम्यान चोरीच्या १४४ बॅटऱ्या फोडून त्यामधून काढलेले १,००८ किलो वितळवलेले शिसे, ज्याची किंमत २ लाख ५२ हजार रुपये आहे, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली इको कार (एमएच-०४-जीआर-५८७८) किंमत २ लाख रुपये, असा एकूण ४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मोबाईल टॉवरवरील बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून सलग पाच गुन्ह्यांची उकल करण्यात नेरळ पोलिसांनी बजावलेली कामगिरी उल्लेखनीय मानली जात असून, या कारवाईमुळे अशा प्रकारच्या संघटित चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.