उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा तालुका शिवसेनेचे समाजोपयोगी उपक्रम; रक्तदान शिबिर, शेतकऱ्यांना खत वाटप व गुणवंतांचा सत्कार
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना रोहा तालुक्याच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिर, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना खत वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा उपक्रमांद्वारे समाजसेवेचा आदर्श निर्माण करण्यात आला.
“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत रोठ बुद्रुक शिवसेना शाखेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला शिवसैनिक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या रोठ बुद्रुक शिवसेना शाखेच्या या उपक्रमाचे यंदाही सर्व स्तरांतून कौतुक झाले.
याच उपक्रमांच्या मालिकेत जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना खत वाटप करून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. शेतकरी हिताचा विचार करून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांनी तसेच रोठ ग्रामपंचायतीने कार्यकुशल सरपंच तथा शिवसेना रोहा तालुका प्रमुख नितीनशेठ वारंगे आणि शिवसैनिकांचे आभार मानले.
रोहा तालुका प्रमुख नितीन वारंगे यांच्या नेतृत्वाखाली उपतालुका प्रमुख सचिन फुलारे, दुर्गेश नाडकर्णी, तालुका संघटिका सौ. अमृताताई साळुंखे, कार्यालय प्रमुख प्रमोद तांबडे, रोहा शहर प्रमुख राजेश (राजा भाई) काफरे तसेच तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांच्या सहकार्याने सर्व उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले.
या कार्यक्रमांना माजी तालुका प्रमुख विष्णूभाई लोखंडे, धाटाव विभाग प्रमुख सुरेंद्र मोरे तसेच काँग्रेसचे रोहा शहराध्यक्ष विनोद सावंत यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना तालुका प्रमुख नितीन वारंगे यांनी, “बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे धोरण अंगीकारून शिवसैनिक कायम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामागे ठामपणे उभे राहतील. पक्ष पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेईल. प्रत्येक शिवसैनिकाने बाळासाहेबांचे विचार तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी कार्य करावे,” असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दत्ताराम डाके, उद्देश वारंगे, निरंजन वारंगे, समीर वारंगे, रुपेश मोरे, शशिकांत साळुंखे, ज्ञानेश्वर दळवी, विष्णूभाई लोखंडे, सुरेंद्र मोरे तसेच सौ. सुप्रिया वारंगे, दीक्षिती वाघमारे आणि इतर अनेक शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले. समारोपावेळी सर्व रक्तदाते, शेतकरी, पदाधिकारी आणि उपस्थितांचे आभार मानण्यात आले.