रोह्यात महापुराची काळरात्र; प्रशासनाच्या तत्परतेने मोठी जीवितहानी टळली
रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते
रोहा तालुक्यात गेल्या २४ तासांत तब्बल १७२ मिमी पावसाची नोंद झाल्याने आणि भिरा धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने सोमवारी मध्यरात्री रोहा शहरासह परिसरात महापुराचे संकट निर्माण झाले. प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवक आणि स्थानिक तरुण यांनी रात्रभर धावपळ करून बचावकार्य राबविल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
अष्टमी येथील खालचा मोहल्ला, कोळीवाडा, धनगर आळी, मराठा आळी, त्रिमूर्ती नगर, शिवकृपा, धनलक्ष्मी परिसर, रोहा बाजारपेठ, कासार आळी आदी भागांत पुराचे पाणी घरांमध्ये शिरले. काही ठिकाणी तब्बल तीन फूट पाणी साचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वीज पेट्या आणि मीटर बॉक्स पाण्याखाली गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण रोहा शहराचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. सायरन यंत्रणा बंद पडल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याचे, घराबाहेर न पडण्याचे आणि शेजाऱ्यांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी रात्रभर नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवत बचावकार्याचा आढावा घेतला. मुख्याधिकारी अजय एडके यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका प्रशासन, महसूल विभाग, पोलीस, प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरसेवक, एनव्हीएसएसआर, RESQ पुणे, स्थानिक स्वयंसेवक आणि तरुणांनी समन्वयाने बचाव मोहीम राबविली.
माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्याचा समन्वय साधला. अष्टमी परिसरातील पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राफ्टिंग बोटींची व्यवस्था करण्यात आली. अन्सारी कुटुंबासह अनेकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. बोटींच्या वाहतुकीसाठी विशेष वाहनांचीही तातडीने व्यवस्था करण्यात आली.
दरम्यान, आंबा व कुंडलिका नद्यांची पाणीपातळी धोकादायकरीत्या वाढल्याने रोहा-कोलाड, रोहा-नागोठणे, वाकण-पाली तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भिसे खिंड आणि सुकेली खिंड येथील वाहतूकही ठप्प झाली आहे.
तहसील प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन सेवांसाठी नगरपालिकेकडे बोट उपलब्ध करून देण्यात आली असून व्यापारी आस्थापनांमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे नियमानुसार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सद्यस्थितीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
महापुराच्या या भीषण संकटात प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी दाखविलेला समन्वय, तत्परता आणि सेवाभाव यामुळे अनेकांचे प्राण वाचले असून रोह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा हा एक प्रेरणादायी अध्याय ठरला आहे.