*रोह्यातील अस्वच्छ हॉटेलांवर कारवाई कधी? अन्न सुरक्षा अधिकारी नितीन मोहिते यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष*
रोहा:समीर बामुगडे
रोहा शहरातील काही हॉटेल, मिठाई दुकाने तसेच भेळपुरी विक्री केंद्रांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याने दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. अन्नपदार्थांची गुणवत्ता व स्वच्छता तपासण्यासाठी संबंधित आस्थापनांची तातडीने पाहणी करून नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, अनेक ठिकाणी अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थांची तयार करण्याची व विक्री करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थ ठेवणे, स्वच्छ पाण्याचा अभाव, परिसरातील अस्वच्छता, कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावणे आणि स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्याच्या काळात अन्नातून पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या मते, अन्न सुरक्षा विभागाने अचानक तपासणी मोहीम राबवून हॉटेल, मिठाई दुकाने, बेकरी आणि भेळपुरी विक्रेत्यांची सखोल पाहणी करावी. जेथे नियमांचे उल्लंघन आढळेल, त्या ठिकाणी केवळ नोटीस देऊन न थांबता दंडात्मक कारवाई, परवाना निलंबन किंवा आवश्यक असल्यास आस्थापना सील करण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे इतर व्यावसायिकांनाही स्वच्छतेचे नियम पाळण्याचा संदेश मिळेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काही नागरिकांमध्ये हॉटेल व्यावसायिकांकडून आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चाही सुरू आहेत? मात्र, या चर्चांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, याची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणीही पुढे येत आहे.
विशेष म्हणजे, रोहा शहरात दररोज मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, नोकरदार तसेच बाहेरगावचे प्रवासी विविध हॉटेल व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये भोजन करतात. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळले जाणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने नियमित तपासणी करून दोषींवर कारवाई केल्यास नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.
आता सर्वांचे लक्ष अन्न सुरक्षा अधिकारी नितीन मोहिते यांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. रोह्यातील अस्वच्छ हॉटेल, मिठाई दुकाने व भेळपुरी विक्रेत्यांवर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, याची नागरिक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर विषयावर प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ अन्न मिळण्याची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.