*रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
रायगड:समीर बामुगडे
रायगड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि विनापरवाना सुरू असलेल्या व्यवसायांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी दूध, खवा, मिठाई, खाद्यपदार्थ तसेच बार आणि रेस्टॉरंटमधील अन्न व पेयांच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. भेसळयुक्त दूध, निकृष्ट दर्जाचा खवा, मिठाई तसेच इतर खाद्यपदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. मात्र अन्न व औषध प्रशासनाकडून अपेक्षित प्रमाणात धाडी आणि तपासणी मोहिमा राबवल्या जात नसल्याचा आरोप होत आहे.
याशिवाय जिल्ह्यात अनेक खाद्य व्यवसाय फूड लायसन्सशिवाय सुरू असल्याचेही बोलले जात आहे. नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू असतानाही संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दूध संकलन केंद्रे, खवा उत्पादन करणारे कारखाने, मिठाई उत्पादक, हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्स यांची विशेष तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त नितीन मोहिते यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबवावी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.