शासनाच्या उदासीनतेमुळे ज्येष्ठ नागरिकांचे जीवन उपेक्षित; समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी
रोहे | प्रतिनिधी (संतोष सातपुते)
ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन विविध योजना जाहीर करत असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना उपेक्षित जीवन जगावे लागत असल्याची खंत रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पालकर यांनी व्यक्त केली. खारघर ते पोलादपूर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश पालकर, उपाध्यक्ष अविनाश म्हात्रे, काशिनाथ पिंगळे, रामदास पाटील, विजय घोसाळकर, मारुती राऊत, प्रकाश पाटील, नंदकुमार जोशी, रामचंद्र बांधनकर, अनंत टमके, अनंत जोशी, श्री. घाडगे, सुनीता पालकर तसेच रोहे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष पी. बी. सरफळे, एस. एम. गायकवाड, सुरेश मोरे, शेखर गुंड, अरुण करंबे, विजय देसाई, दत्तात्रय तवटे, धनपाल तिखे, प्रफुल्ल ताम्हाणे, दिलीप शेवाळे, नंदकुमार भादेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेत बोलताना सुरेश पालकर म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांना कोणतेही ठोस आर्थिक पाठबळ उपलब्ध नाही. शासनाने अनेक योजना जाहीर केल्या असल्या तरी त्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. मुंबईच्या आझाद मैदानावर सुमारे १५ हजार ज्येष्ठ नागरिकांनी आंदोलन केले होते, मात्र त्यावेळी केवळ एका आमदाराने उपस्थिती दर्शविली. शासनाचे प्रतिनिधी किंवा अधिकारी देखील आंदोलनस्थळी फिरकले नाहीत, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, मंत्रालय आणि कोकण भवन येथे पाठपुरावा केल्यानंतर अधिकाऱ्यांनीही ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद नसल्याचे सांगितले. आयुष्यमान कार्ड असतानाही अनेक रुग्णांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. देशात सुमारे १ कोटी ४० लाख ज्येष्ठ नागरिक असून ही अनुभवी व ज्ञानी संपत्ती आहे. त्यांच्या हक्कांसाठी आणि योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सभेत जिल्ह्यातील विविध शाखांच्या प्रतिनिधींनीही आपल्या समस्या आणि सूचना मांडल्या. प्रकाश पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याची खंत व्यक्त करत मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा, असे मत व्यक्त केले. तसेच जिल्हा संघटनेने केलेला पत्रव्यवहार सर्व शाखांपर्यंत पोहोचवावा आणि एसटी प्रवासासाठी स्मार्ट कार्डची सक्ती करू नये, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, रोह्यातील माजी नगराध्यक्ष तथा समाजसेवक समीर जनार्दन शेडगे यांनी जिल्ह्यातून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था केली. तसेच प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमस्थळी नगराध्यक्षा कु. वनश्री अवनी समीर शेडगे, उपाध्यक्ष, गटनेते, सभापती, नगरसेवक आदींनी उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या प्रश्नांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सभेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी आणि त्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.