आपण कुणबी संघटित नसल्याने आपल्याला महत्त्व नाही. संघटित राहिलो तरच आपण केलेला विद्यार्थ्यांचा सत्कार सत्कारनी लागेल —ओबीसी जिल्हाध्यक्ष सुरेशजी मगर , कुणबी समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
कोलाड (श्याम लोखंडे)
कुणबी समाज हा संघटित नाही. त्यामुळे आपल्याला महत्त्व नाही.तर आपण भविष्याच्या काळात संघटित राहिलो तरच आज आपण केलेला विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा सत्कारणी लागेल असे वक्तव्य ओबीसी जिल्हा अध्यक्ष कुणबी समाज नेते तथा रोहा पंचायत समिती सदस्य सुरेश मगर यांनी केले.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा तालुका रोहा विभागीय ग्रुप कोलाड, खांब, आणि कुडली यांच्या वतीने व उद्योजक तथा युवा नेते प्रमोदशेठ अनंत म्हसकर यांच्या विशेष सहकार्यातून कुणबी जोडो अभियान, व इयत्ता दहावी बारावी व उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी वर्गाचा गुणगौरव समारंभ सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
प्रमोद शेठ अनंत म्हसकर यांच्या माध्यमातून कोलाड, खांब, कुडली, विभागीय कुणबी समाजाच्या कोलाड येथील कै.द ग तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात कुणबी जोडो अभियान व विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी विचार मंचावर रोहा तालुका कुणबी समाज अध्यक्ष रामचंद्र सकपाळ, उपसभापती संजयजी मांडुलूस्कर,ओबीसी तालुका अध्यक्ष अनंताजी थिटे, डॉ. सागर सानप, सचिनजी कदम चेअरमन महेंद्रजी पोटफोडे, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ धनावडे ,सुनील ठाकूर, कुणबी युवा संघ मुंबई अध्यक्ष युवराज कांबळे कुणबी समाज अध्यक्ष राजेश कदम, डॉ. मंगेश सानप युवक तालुका अध्यक्ष मुकेश भोकटे, बाबुराव बामणे, नरेंद्र जाधव मनोज शिर्के, रोहा तालुका महिला अध्यक्षा दीपिका भगत, शिल्पा मरवडे, रचना कळमकर, खेळू ढमाळ, गजानन बामणे ,दत्ताराम मंचेकर रवींद्र मामलुसकर, देविदास सानप, दर्शन तेलंगे, संतोष बाईत, संजय सानप,समीर महाबळे. संतोष भोईर, रवींद्र मरवडे ,रमण कापसे, निवास खरीविले शशिकांत कडू, महेश तुपकर,सह मान्यवर तसेच आदी विभागीय कुणबी समाज बांधव तसेच विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पूढे बोलताना सुरेश मगर म्हणाले की आज कोलाड, खांब, कुडली विभागाने समाजाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि जमलेली उपस्थिती पाहिली तर ही उद्याच्या कुणबी जोडो अभियानाची साक्ष आहे. आजची कुणबी समाज बांधवांची उपस्थिती ही एखाद्या राजकारण्याला लाजवेल अशी आहे. केवल आपल्याला दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून चालणार नाही तर पुढे त्यांना करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात म्हणून कुणबी समाजातील मुलांनी केवळ इंजिनियर न होता आयएसआय अधिकारी व्हावेत. व कुणबी समाजातील मुलांकरता त्यांच्या शिक्षणाकरता प्रमोद शेठ म्हसकर सामाजिक भावनेतून पुढाकार घेऊन सहकार्य करत आहेत हे खूप मोठे सामाजिक योगदान असल्याचे. मार्गदर्शन सुरेश मगर यांनी केले.
कुणबी समाजाच्या जातीच्या दाखल्याबाबत त्यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की आपण जन्माने कर्माने कुणबी असून देखील आपल्याला दाखले मिळत नाहीत.ही मोठी खंत आहे. जरांगे येतो आणि कुणबी समाजाचे दाखले घेऊन जातो त्यांच्या सगे सोयऱ्यांना दाखले मिळतात. आपण कुणबी असून दाखले मिळत नाहीत. निवडणुका आल्या की इथले राजकारणी समाजाच्या जवळ येतात .आश्वासने देतात आणि निवडणुका संपल्या की आपल्या समाजाकडे ढुंकुन बघत नाहीत. अशी परिस्थिती आपल्या कुणबी समाजाची आहे .आपण संख्येने जरी असलो तरी संघटित नसल्याने आपल्याला राजकारणी महत्त्व देत नाहीत. एससी एसटी समाजाला गृह चौकशी करून जातीचे दाखले मिळतात. मग आपल्याला गृह चौकशी करून दाखले का मिळत नाहीत. त्यामुळे भविष्याच्या काळात आपल्या मुलाबाळांची शैक्षणिक प्रगती व कुणबी जात म्हणून अस्तित्व टिकवायचे असेल तर संघटित होणे ही काळाची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणालेत शिका व संघटित व्हा व संघर्ष करा हे धोरण येत्या काळात कुणबी समाजाला राबवावे लागेल.
कारण कुणबी समाजाला जाणून-बुजून वंचित ठेवले जात आहे. कुणबी समाज एक झाला तर आपली डाळ शिजणार नाही इथल्या राजकीय नेत्यांना पक्क माहित असल्याने वर्षानुवर्ष आपण राजकीय गुलामगिरी भोगत आहोत. आपल्या समाजातील एकाला पुढे न्यायचं दुसऱ्याला दाबायचं हीच कूट नीती आजपर्यंत सुरू आहे .आपल बाहुले म्हणून वापर होत आहे. हे कुठेतरी थांबवण्याची गरज निर्माण झाल्याचे वक्तव्य ओबीसी जिल्हा अध्यक्ष कुणबी समाज नेते सुरेश मगर यांनी केले.
यावेळी कुणबी समाजात सक्रिय काम करणारे डॉक्टर श्याम लोखंडे यांना रोहा तालुका प्रेस क्लब अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार मरवडे सर यांनी केले प्रास्ताविक राजेश कदम तर आभार नरेश बिरगावले यांनी मांडले. तसेच प्रमोद शेठ म्हसकर काही कारणास्तव हजर राहू शकले नाहीत परंतु त्यांचे समाजावर असणारे प्रेम आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ झाले पाहिजे यासाठी त्यांनी वॉट्सप द्वारे “शिक्षण, संघटन आणि संघर्ष हेच प्रगतीचे सूत्र आहे; आणि एकजूट हा कुणबी समाजाचा खरा दागिना आहे.”
याच विश्वासासह कुणबी समाज हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि शेतीप्रधान जीवनाचा कणा आहे. आपल्या पूर्वजांनी कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या बळावर समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शेतात राबून देशाची अन्नाची गरज भागवणारा शेतकरी म्हणजे कुणबी समाजाचा अभिमान आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेत कुणबी समाजाचे मोठे योगदान होते. स्वराज्याच्या लढाईत तसेच समाजाच्या विकासात या समाजाने नेहमीच अग्रस्थानी राहून कार्य केले आहे.
मित्रांनो, आजचा काळ हा शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आहे. त्यामुळे आपल्या समाजातील प्रत्येक मुलगा आणि मुलगी उच्च शिक्षित झाली पाहिजे. शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाबरोबरच एकता, संघटन आणि सामाजिक बांधिलकी आवश्यक आहे.
आपण आपल्या परंपरेचा अभिमान बाळगूया, पण त्याचबरोबर आधुनिक विचार स्वीकारूया. समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि वाईट प्रथांपासून दूर राहून युवकांना योग्य दिशा देणे ही आजची गरज आहे. त्यामुळे अधिक समाजाचे काम तसेच शैक्षणिक मदतीचा हात करण्यात मी सदैव तत्पर असल्याचा मेसेज समाजाला आणि आजच्या पिढीला प्रमोद म्हसकर पाठवला असल्याचे वाचन नरेश बिरगावले यांनी प्रसंगी कार्यक्रमात केले.
कार्यक्रमात डॉक्टर सागर सानप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर युवराज कांबळे यांनी कुणबी संघटन विषयी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रम हा भव्य दिव्य झाला. व कुणबी बांधवांमध्ये एक समाजाविषयाची बांधिलकी आणि आपुलकी मोठी या कार्यक्रमानिमित्ताने दिसून आली. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोलाड खांब कुडली विभागातील कुणबी पदाधिकारी व युवक मंडळाने अथक परिश्रम घेतले.


