पनवेलच्या कल्पतरू रिव्हरसाईडची हरित ऊर्जा क्रांती ; ४०० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित; दरवर्षी ८० लाख ते १ कोटी रुपयांची बचत; महाराष्ट्रातील गृहनिर्माण क्षेत्रासाठी आदर्श प्रकल्प
पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई व पनवेल परिसरातील पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पनवेलमधील कल्पतरू रिव्हरसाईड या भव्य निवासी संकुलाने शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आणखी १०० किलोवॅट क्षमतेच्या नव्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन यशस्वीरीत्या केले. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यापूर्वी या संकुलात ३०० किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. त्या प्रकल्पाचे उद्घाटन आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले होते. नव्या १०० किलोवॅट प्रकल्पामुळे आता संकुलाची एकूण सौरऊर्जा निर्मिती क्षमता ४०० किलोवॅटपर्यंत पोहोचली असून, महाराष्ट्रातील निवासी गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा उपक्रमांपैकी हा एक प्रकल्प मानला जात आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे कल्पतरू रिव्हरसाईड हे निवासी संकुल नवी मुंबईतील आदर्शवत आणि पर्यावरणस्नेही सोसायटी म्हणून पुढे आले आहे. ४०० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणाऱ्या महाराष्ट्रातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये या आदर्श सोसायटीचा अग्रक्रमाने समावेश होत असून, त्या अनुषंगाने राज्यातील अशा पहिल्या तीन प्रमुख गृहनिर्माण सोसायट्यांपैकी एक म्हणून तिची नोंद घेतली जात आहे.
सौरऊर्जेचा वाढता वापर, पर्यावरण संवर्धनाची बांधिलकी आणि ऊर्जा बचतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम यांमुळे कल्पतरू रिव्हरसाईड इतर गृहनिर्माण संकुलांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. सुमारे ८५० कुटुंबांचे वास्तव्य असलेल्या कल्पतरू रिव्हरसाईडमध्ये ओला व सुका कचरा व्यवस्थापन, कंपोस्ट निर्मिती, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, पुनर्वापरित पाण्याचा वापर, व्यापक वृक्षारोपण आणि विविध पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. त्यामुळे हे संकुल ‘ग्रीन कम्युनिटी’चे आदर्श उदाहरण म्हणून ओळखले जाते. ४०० किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित झाल्याने सोसायटीच्या वीज खर्चात मोठी बचत होणार असून दरवर्षी सुमारे ८० लाख ते ०१ कोटी रुपयांपर्यंत बचत अपेक्षित आहे. त्याचबरोबर राज्याच्या वीज वितरण व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठीही हा प्रकल्प मोलाची भूमिका बजावणार आहे. यावेळी अध्यक्ष प्रशांत बाळाराम ठाकूर यांनी या प्रकल्पाच्या यशाचे श्रेय मिलिंद कुलकर्णी, अभिजित पाटील आणि सतीश पिल्ले यांना देत सांगितले की, “ऊर्जा स्वावलंबन आणि पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. कल्पतरू रिव्हरसाईडने समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हरित ऊर्जा निर्मितीच्या दिशेने वाटचाल करू इच्छिणाऱ्या कोणत्याही गृहनिर्माण संस्थेला आमच्या अनुभवाचा लाभ देण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. महाराष्ट्रातील अधिकाधिक सोसायट्या ऊर्जा स्वावलंबी व्हाव्यात, ही आमची भूमिका आहे. प्रमुख मान्यवर म्हणून बोलताना नगरसेवक परेश ठाकूर यांनी कल्पतरू रिव्हरसाईडच्या व्यवस्थापन समितीचे कौतुक करताना सांगितले की, “८५० कुटुंबांचे हे विशाल संकुल म्हणजे स्वतःमध्ये एक छोटे शहर आहे. अशा ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर प्रकल्प यशस्वीपणे राबविणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. या कार्यक्रमास सोसायटीचे सचिव नितीन ठाकूर, खजिनदार पुरुषोत्तम तळेकर, व्यवस्थापन समिती सदस्य, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते