अलिबागच्या रंगभूमीवर अभिनयाचा अविष्कार; राज्यस्तरीय एकपात्री स्पर्धेत कलाकारांचा डंका!
एकता इंटरप्रायझेस’ आणि ‘कलारंग’चा स्तुत्य उपक्रम; सामाजिक बांधिलकीचाही जागर
अलिबाग(रत्नाकर पाटील)
मुंबईतील एकता इंटरप्रायझेस या संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आणि सौ. एकता निखिलेश म्हात्रे यांच्या सौजन्याने तसेच कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था अलिबाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा २०२६’ नुकतीच अलिबाग येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यासह मुंबई, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या विविध शहरांतून आलेल्या कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे दोन गट करण्यात आले होते, ज्यामध्ये लहान गटात १८ आणि मोठ्या गटात १७ अशा एकूण ३५ स्पर्धकांनी विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि ज्वलंत विषयांवर आपले सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक जमाल सय्यद, अ.भा.म.ना.प. रायगड शाखेचे माजी अध्यक्ष संदीप गोठीवरेकर, रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष विकास पाटील, जिल्हा रुग्णालयाचे सिद्धार्थ चौरे, आयोजक एकता म्हात्रे, निखिलेश म्हात्रे आणि कलारंगचे अध्यक्ष प्रकल्प वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध अभिनेते विकास चव्हाण आणि सागर नार्वेकर यांनी केले.
या चुरशीच्या स्पर्धेत लहान गटात स्मंद कोठेकर याने प्रथम, दूर्वा झावरे हिने द्वितीय, तर आराध्य पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला. रियांश चिंचकर आणि काव्या पाटील यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला, तर अनन्या पाटील आणि ओवी म्हात्रे यांच्या सादरीकरणाची विशेष लक्षवेधी म्हणून निवड करण्यात आली. मोठ्या गटात छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धेश्वर थोरात याने प्रथम क्रमांकावर मोहोर उमटवली. तर ठाणे येथील प्रशांत पाटील याने द्वितीय, आणि पनवेल येथील निकीता घाग हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. जीत जाधव आणि तन्वी पाटील यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली, तर भार्गवी पाटील आणि प्रकाश पाटील यांनी लक्षवेधी कलाकार म्हणून आपली छाप पाडली.

केवळ कलेचा आविष्कारच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचे दर्शनही या स्पर्धेच्या निमित्ताने घडले. जिल्हा रुग्णालय रायगडच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या “एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” या अभियानांतर्गत विशेष जनजागृती करून उपस्थितांना शपथ देण्यात आली. तसेच, सामाजिक आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान आणि प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून पुस्तके देऊन वाचन संस्कृती जोपासण्याचा उपक्रम राबवण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभास संजीवनी नाईक, अँड.रत्नाकर पाटील आणि विक्रांत वार्डे यांसारखे मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशाल गोरड, संदेश मायेकर, शेखर झावरे, प्रतिम सुतार, निखिल कदम यांच्यासह कलारंगच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. स्पर्धकांच्या उदंड प्रतिसादामुळे ही स्पर्धा अलिबागच्या सांस्कृतिक चळवळीत एक मैलाचा दगड ठरली आहे.