अश्वत्थ मारुती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा; हजारो भाविकांची उपस्थिती
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त राजमुद्रा फाउंडेशन आणि श्री मारुती भक्त मंडळ यांच्या वतीने रोठ बुद्रुक येथील अश्वत्थ मारुती मंदिरात यंदाही भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा उत्सव अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून अश्वत्थ मारुती मंदिरात हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, प्रत्येक वर्षी भाविकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे या उत्सवाची व्याप्ती अधिक भव्य होत असल्याचे पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांसह परिसरातील भाविकांसाठी हा उत्सव एक श्रद्धेचा आणि भक्तीचा केंद्रबिंदू बनला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे रुद्राभिषेकाने झाली. वेदघोष आणि मंत्रोच्चारांच्या पवित्र वातावरणात श्री मारुतीरायांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दिवसभर तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले. मंदिर परिसरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद मिळावा, यासाठी स्वयंसेवकांनी उत्तम नियोजन केले होते.सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या भजन-कीर्तन कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पारंपरिक वाद्यांच्या साथीने सादर करण्यात आलेल्या अभंग आणि कीर्तनांनी उपस्थित भाविकांना आध्यात्मिक आनंद दिला. अनेक भक्तांनी या कार्यक्रमात सहभाग घेत भक्तीमय वातावरण अधिक वृद्धिंगत केले.
तसेच महाप्रसादाचे आयोजनही अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. प्रेम, सेवा आणि भक्तीभावाने तयार केलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. संपूर्ण कार्यक्रमात स्वच्छता, शिस्त आणि भक्ती यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या निमित्ताने हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून श्री हनुमंताचे दर्शन घेतले. धाटाव औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसीमधील विविध कंपनींचे मॅनेजर, अधिकारी व कामगार, तसेच विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे मंदिर परिसर दिवसभर गजबजलेला होता.
उत्सवाच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या उत्सवात सहभाग घेतला. स्वयंसेवकांनी केलेले नियोजन, वाहतूक व्यवस्था, प्रसाद वितरण आणि शिस्त राखण्याचे कार्य कौतुकास्पद ठरले. या कार्यक्रमाचे आयोजन राजमुद्रा फाउंडेशनचे अमित घाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, सर्वांच्या सहकार्यामुळे हा उत्सव यशस्वीरीत्या पार पडल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.


