शिवसेनेतून हकालपट्टी; आरोप निराधार – ऍड. मनोज कुमार शिंदे यांची प्रतिक्रिया
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
रोहा तालुक्यात शिवसेना संघटन वाढवणाऱ्या ऍड .मनोज कुमार शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या निर्णयानंतर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करत, आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार व बिनबुडाचे असल्याचा ठाम दावा केला.
ते म्हणाले की, “राजकारण हे सुसंस्कृत व अभ्यासू माणसांचे क्षेत्र राहिलेले नाही. चांगल्या-वाईट माणसाची पारख न करता निर्णय घेतले जातात. मला पक्षातून काढल्यामुळे मी व्यथित झालो असून यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांचे ‘राजकारण लय वंगाळ आहे’ हे शब्द आठवले.”
रोहा येथे झालेल्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी शिंदे यांची हकालपट्टी जाहीर केली. यानंतर शिंदे यांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, “मी रोहा तालुक्यात शिवसेनेचा संस्थापक सदस्य असून २००८ साली तालुकाप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. गावोगावी जाऊन संघटनेचे रोपटे लावले, जे आता वटवृक्ष होण्याच्या मार्गावर होते.”
ते पुढे म्हणाले की, “मी ११ जानेवारी रोजी तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरही मंत्री भरतशेठ गोगावले आणि दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी माझ्यावर उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. मात्र रोहा नगरपालिकेतील पराभवाचे खापर माझ्यावर फोडण्यात आले, जे अन्यायकारक आहे.”
शिंदे यांनी आपल्या हकालपट्टीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “उत्तर रायगड जिल्हाध्यक्षांना मला पक्षातून काढण्याचा अधिकार नाही. मला बदनाम करून कोणाचे कर्तृत्व झाकले जाणार नाही. आढावा बैठकीच्या नावाखाली हा निर्णय घेण्यात आला.”
पुढील राजकीय वाटचालीबाबत बोलताना ते म्हणाले, “मला अनेक पक्षांकडून ऑफर्स आहेत. लवकरच योग्य निर्णय घेऊन नव्या जोमाने राजकारणात काम सुरू करेन. नवीन तालुकाप्रमुखाला शुभेच्छा देतो.”
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच पत्रकार परिषद घेतल्याचे सांगत, लवकरच पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचेही स्पष्ट केले.


