मनमिळावू स्वभावाच्या अनिता सुर्वे काळाच्या पडद्याआड ; परिसरात शोळकळा
प्रतिनिधी – शुभ्रा आडाव न्हावे
रेवदंडा परिसरातील सर्वांच्या मनात आपलेपणाचे स्थान निर्माण करणाऱ्या कै. अनिता अनंत सुर्वे यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान रामनवमीच्या पावन दिवशी, गुरुवार दि. २६ मार्च रोजी जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावामुळे कै. सुर्वे या सर्वांच्या विशेष जिव्हाळ्याच्या होत्या. कोणालाही मदतीची गरज भासली की तत्परतेने पुढे सरसावणे, प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधणे आणि नातेसंबंध जपण्याची त्यांची वृत्ती यामुळे त्यांनी समाजात वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या साधेपणातही माणुसकीची खरी श्रीमंती दिसून येत असे.
त्यांच्या अकस्मात जाण्यामुळे परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सून, जावई तसेच नातू-नाती असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व मित्रपरिवार त्यांना धीर देत आहेत.
कै. अनिता सुर्वे यांच्यावर गुरुवार, दि. २७ मार्च रोजी सकाळी १० वाजता अमर धाम स्मशानभूमी, रेवदंडा येथे अंत्यसंस्कार पार पडले. पुढील दशक्रिया विधी शनिवार, दि. ४ एप्रिल रोजी होणार असून दिवसकार्य मंगळवार, दि. ७ एप्रिल रोजी साई छाया सोसायटी, बँक ऑफ इंडिया, रेवदंडा येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी दुखवटा शिकारला जाणार नसल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशा भावपूर्ण श्रद्धांजली सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.


