अधिक मासानिमित्त रोहा येथे सुरू असलेल्या कीर्तन-प्रवचन मालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
अधिक मासाचे औचित्य साधून रोहा येथील श्री दुर्गादेवी मंदिरात भजनी मंडळ, अभंग सेवा भजनी मंडळ आणि संस्कार भारती रोहा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ३० दिवसीय कीर्तन-प्रवचन मालिकेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दररोज सायंकाळी आयोजित करण्यात येणाऱ्या या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमातून समाजप्रबोधन, अध्यात्म आणि संस्कारांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले जात आहे.
दि. २५ मे २०२६ रोजी नितीन प्रधान यांनी ५१ शक्तीपीठ, दुर्गा सप्तशती, सिंधू मानकर अनुभव, देव्या कवच पाठ १००, देवी सूक्त, गुरुचरित्र आणि श्रीसूक्त यांसारख्या विषयांवर सखोल विवेचन केले. मध्यंतरात श्रीराम जप, वर्तमान आणि माता या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले.
दि. २६ मे रोजी सौ. छाया गोखले यांनी “स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास” या विषयावर प्रभावी कीर्तन सादर करून महिलांच्या जीवनातील संघर्ष, आत्मविश्वास आणि अध्यात्मिक शक्ती यावर भाष्य केले.
दि. २७ मे रोजी ह.भ.प. अंजली कवळे यांनी “व्यर्थ न हा नर देह मनुजा” या विषयावर समाजप्रबोधनपर कीर्तन केले. तसेच संत दामाजी पंत आणि बेदरपूर बादशाह यांच्या चरित्रातून भक्ती, मानवता आणि सेवाभाव यांचे महत्त्व अधोरेखित केले.
दि. २८ मे रोजी सौ. आशाताई वागळे यांनी “कलावती आई”, “ॐ पूर्णमिदम्” तसेच त्रिदंड संन्यास, शांतता, स्वच्छता, शिस्त, कौपीन, दंड, कमंडलू, शक्तिपात आणि कृष्ण प्रताप या विविध आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रवचनातून वैदिक संस्कृती आणि सनातन परंपरेचे महत्त्व उलगडून सांगण्यात आले.
दि. २९ मे रोजी आरती धारप यांनी ज्येष्ठ साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचन सादर केले. साहित्य आणि धर्माच्या माध्यमातून समाजात जनजागृती कशी घडवून आणता येते, याचे प्रभावी विवेचन त्यांनी केले.
या धार्मिक मालिकेमुळे रोहा परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून कीर्तन व प्रवचनांचा लाभ घेत आहेत.