मुरुडच्या सामाजिक-राजकीय क्षेत्रातील आधारस्तंभ हरपला; कै. सुरेशआप्पा शंकर पाटील यांचे निधन
प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव, चणेरा
मुरुड तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक तथा सामाजिक-राजकीय क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्व कै. सुरेशआप्पा शंकर पाटील (वय ७८) यांचे आज दुपारी सुमारे १:३० वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मुरुड स्मशान भुमीत रात्री ११:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने मुरुड तालुक्यावर शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरेशआप्पा पाटील यांनी आपल्या आयुष्यभर सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. ते मुरुड भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुरुड तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. मुरुड नगरपरिषदेमध्ये शिक्षण उपसभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या कार्यकाळात शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले.
व्यावसायिक क्षेत्रातही त्यांनी ‘पाटील खानावळ’च्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या प्रामाणिकपणा, साधेपणा आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे मुरुड परिसरात त्यांना विशेष मान-सन्मान लाभला होता. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमी तत्पर असत, त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व लोकांच्या मनात घर करून राहिले.
त्यांचे कुटुंबही मोठे व एकसंघ आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, चार भाऊ, तीन बहिणी तसेच पुतणे-पुतण्या, भाचे-भाच्या, जावई, सुना असा ५० हून अधिक सदस्यांचा मोठा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबातील चार भाऊ आजही एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होते, ही बाब आजच्या काळात विशेष उल्लेखनीय मानली जाते.
सुरेशआप्पा पाटील हे माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांचे दिर होते, तसेच नगरसेवक विजय नाना पाटील यांचे ते भाऊ होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. विविध क्षेत्रातील व्यक्तींनी अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या निधनाने एक कर्तृत्ववान, प्रामाणिक आणि समाजहिताची जाणीव असलेले नेतृत्व हरपले आहे. मुरुडच्या सामाजिक-राजकीय क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


