*तळा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी संस्था व पालकांनी सभेत घेतले महत्वाचे निर्णय*
तळा -किशोर पितळे-: विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती,शिस्त आणि बदलत्या काळातील आव्हाने विचारात घेऊन, तळे विभाग शिक्षण प्रसारकमंडळाच्या कला-वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात संस्था पदाधिकारी, पालक व शिक्षक यांची नुकतीच एक महत्त्वपूर्ण सहविचार सभा पार पडली. या सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी ‘वर्गात मोबाईल बंदी’ घालण्याचा आणि ‘बारावीचे वर्ग लवकर सुरू करण्याचा’ महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला.तळा येथील महाविद्यालयात आयोजित या सभेत संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के, अध्यक्ष मंगेश देशमुख,सचिव महेंद्रशेठ कजबजे,खजिनदार चंद्रकांत रोडे, शाळा समिती चेअरमन श्रीराम कजबजे, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन बी. के. पटेल, पर्यवेक्षक महादेव लोकरे, वाशी हवेलीचे माजी सरपंच जगन्नाथ तांडेल, पालक प्रतिनिधी महम्मद परदेशी,समीर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेत प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या वर्गातील उपस्थितीवर चर्चा करण्यात आली. सध्याच्या काळात विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावरून विचलित होऊ नये,यासाठी वर्गामध्ये मोबाईल वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा
निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीत शिस्त आणण्यासाठी आणि त्यांच्याशैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी पालकांनी ही सहकार्य करावे, असे आवाहन सचिव महेंद्रशेठ कजबजे यांनी केले.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि बोर्डाच्या परीक्षेची पूर्वतयारी उत्तम व्हावी, या उद्देशाने वार्षिक परीक्षेनंतर लगेचच इयत्ता १२ वीचे नियमित वर्ग सुरू करण्याचे ठरलेआहे.या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे यासाठी विशेष ‘संगणक कोर्स’ सुरू करण्याबाबत अध्यक्ष मंगेश देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली.”केवळअभ्यासच नव्हे, तर मुलांचे चारित्र्य घडवणे ही संस्था आणि पालक दोघांचीही जबाबदारी आहे,” असे मत शाळा समितीचे चेअरमन श्रीराम कजबजे यांनी व्यक्त केले.खजिनदार चंद्रकांत रोडे व विश्वस्त मारुती शिर्के यांनी विद्यार्थ्यांची प्रगती झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व संचालक प्रयत्नशील आहोत असा विश्वास व्यक्त केला. पालक प्रतिनिधी महम्मद परदेशी यांनीही पालकांच्या वतीने आपले विचार मांडले. या सभेला पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून,संस्थेने घेतलेल्या या निर्णयांचे सर्वत्र स्वागत होत आहे. कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक सर्जे व्ही बी तर आभार चेअरमनश्रीराम कजबजे यांनी मानले. यावेळी संस्था पदाधिकारी,पालक प्रतिनिधी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


