*नागोठणे नगरीची आराध्य देवता ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता आणि श्री भैरवनाथ महाराज पालखी सोहळा – 2026*
प्रतिनिधी:सुदर्शन कोटकर
सालाबाद प्रमाणे याहीवर्षी नागोठणे गावाची जागृत श्री जोगेश्वरी माता पालखी सोहळा उत्साहात आणि भक्तिमय, धार्मिक वातावरणात साजरा होत आहे.
नागोठणे हे तसे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी असून ऐतिहासिक महत्व असलेले नैसर्गिक सौंदर्याने नटलेले नगर आहे.
शहराजवळ असलेले अष्टविनायक मंदिरांपैकी एक श्री बल्लाळेश्वर मंदिर, मुरूडचा महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग सागरी किल्ला, अलिबाग समुद्र किनारा व कुलाबा किल्ला अशा सर्वच ठिकाणी जाण्यासाठी नागोठणे हे मध्यवर्ती ठिकाण आहे.

अशा या ऐतिहासिक नगरी मध्ये गावदेवीचा पालखी सोहळा म्हणजे भाविकांसाठी मोठा भक्तीचा सण असतो.
आदल्या दिवशी नागोठणे गावातील ग्रामस्थ, गावचे पाटील सर्व मिळुन हनुमान जयंतीच्या दिवसी देवीला मानपान देतात. याची सुरुवात जोगेश्वरी माता मंदिरातून सुरू होते, तेथून दस्तुरी नाक्यावर घाग परिवाराचे कुलदैवत आणि नागोठणे गावाची वेष म्हणुन ओळखले जाणाऱ्या श्री बापदेव महाराज मंदिरात बोकडाचा बळी देऊन पुढे जातात,
त्यानंतर नागोठणे S T स्टँड तेथुन कोळीवाडा मार्गे रमाई नगर ते अंगार आळी अशाप्रकारे संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालुन वाईट शक्तींना तृप्त करून गावाबाहेरच रहा अशी मागणी केली जाते, आणि श्री जोगेश्वरी मातेला संपूर्ण गावाची सुरक्षा करण्याची विनवणी केली जाते.
दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मंदिर ट्रस्टी आणि उत्सव कमिटी व ग्रामस्थाच्या सहकार्यातून पालखी निघते. संपुर्ण गावात गल्लीगलीतून सोसायट्यांमध्ये पालखीची रांगोळ्या काढून मनोभावे पूजा केली जाते.
चाकरमानी या उत्सवासाठी खास सुट्टी घेऊन गावाला येतात.
सगळीकडे आनंदीआनंद पसरलेला असतो.
जोगेश्वरी माता ही तीन तळ्यांच्या सान्निध्यात वसलेली असल्यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक व निसर्गरम्य महत्त्व प्राप्त झाले आहे. परिसरातील शांत वातावरण आणि तळ्यांमधील पाण्याचे सौंदर्य यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो.
पालखी सोहळ्याच्या दिवशी मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तांची गर्दी उसळते. देवीची विधीवत पूजा-अर्चा करून पालखी सजवली जाते. ढोल-ताशांच्या गजरात, जयघोष करत पालखीची मिरवणूक काढण्यात येते. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले महिला-पुरुष, तसेच तरुणांचा उत्साह या सोहळ्याला अधिक रंगत आणतो.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे तीन तळ्यांच्या परिसरातून निघणारी पालखी, जी संपूर्ण गावातून प्रदक्षिणा घालत पुन्हा मंदिरात येते. भाविक मार्गावर फुलांची उधळण करत देवीचे स्वागत करतात. ठिकठिकाणी प्रसादाचे वाटपही करण्यात येते.
नागोठणे येथील हा पालखी सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, गावाच्या एकात्मतेचे आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या सोहळ्यामुळे गावाला एक वेगळी ओळख मिळाली असून, दरवर्षी अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.
सलग तीन दिवस संपुर्ण नागोठणे गावातून पालखी फिरते.
अशी आख्यायिका सांगितली जाते की या पालखीतून माता जोगेश्वरी भैरवनाथा बरोबर गाव प्रदक्षिणा करते. आणि भक्तांच्या पाठीशी राहते.


