श्री तीर्थ क्षेत्र तळाघर नगरी हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमली,शुभ मंगलम सावधान, ऐतिहासिक महादेवाच्या यात्रेला अलोट गर्दी,हर हर महादेवाच्या जयघोषात देवाचा लग्न सोहोळा थाटामाटात,लाखोंची उलाढाल.
रोहा (श्याम लोखंडे/नंदकुमार बामुगडे) रोहा तालुक्यातील श्री क्षेत्र तळाघर नगरी हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमली चैत्र महिन्यात भरविण्यात आलेल्या रोहा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि महाराष्ट्रातील आगळीवेगळी बहुजन समाजाच्या प्रथा ,परंपरा जपणाऱ्या तळाघर येथील प्रसिद्ध स्वयंभू महादेवाच्या यात्रेला तसेच श्री शंभू महादेव आणी पार्वती मातेचा आगळा वेगळा विवाह सोहळा पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी २६ व २७ मार्च रोजी दोन दिवस अलोट गर्दी झाल्याचे पहावयास मिळत आहे.दरवर्षी रामनवमीच्या आदल्या दिवशी या ठिकाणी रात्रौ बारावाजता श्री महादेवाचे लग्न लागते.हे लग्न पाहण्यासाठी आणि या यात्रेचा आनंद घेण्यासाठी रोहा, मुरूड, श्रीवर्धन, तळा, म्हसळा सह विविध ठीकानाहून लाखो भाविक हा आनंददायी सोहळा पाहण्यासाठी सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले.हर हर महादेवाच्या जयघोषात शुभ मंगलम सावधान म्हणत देवाचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात फुले अक्षतांचा वर्षाव करत रामनवमीच्या दिवशी गुरुवारी २६ मार्च रोजी रात्री बारा वाजता संपन्न झाला.तर शुक्रवारी भर जत्रा असून या दिवशी देखील विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले गेले.
बारा बलुतेदार आलुतेदार यांचे दैवत श्री तीर्थक्षेत्र स्वयंभू शंभूमहादेव मंदीर तळाघर येथे देवाचा लग्न पारंपारिक पद्धतीने व जुन्या चालीरीती रिवाजाप्रमाणे धार्मिकविधी , मंगलाष्टके म्हणत झाला,तालुक्यातील महादेवाडीचे भगत सुतार यांच्या मांडीवर देवाची मूर्ती देतात येथील धाटाव गावचे राटाटे यांच्या मांडीवर माता पार्वती मातेची मूर्ती देऊन बसवतात.रितीरिवाजाप्रमाणे दोन्ही कडील करवली असतात,तर हा लग्न सोहळा पाहण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून मोठया प्रमाणात नागरीक तसेच भाविक उपस्थित होते. सुतार , चांभार , वाणी , शिंपी , तेली , परिट , जंगम , ब्राह्मण , मराठा , कुणबी , कराडी , कोळी , लोहार , कुंभार , आगरी , नाभिक असे अठरा पगड जातीचे बारा बलुतेदार या देवाच्या यात्रेकरीता दरवर्षी मोठ्या उत्साहाने येत असतात. दोन दिवस ही यात्रा सुरू असते, यात्रेचा मानसन्मान हा पुरातन आहे, पेशवे व सिद्धी यांच्यात झालेल्या करारात या यात्रेच्या लग्न सोहळ्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येते.
धाटाव पंचक्रोशीतील तळाघर, लांढर, बोरघर ,वाशी, महादेववाडी ,धाटाव यात्रा पंच कमिटी असते, यावेळी लग्न सोहळ्यास लागणारी मातीची भांडी दमखाडीचे कुंभार देतात, तळाघरेचे मोरे दिपमाळ लावतात, खारगाव येथून पालखी येते, मानाचे निमंत्रण देण्याचामान बामुगडे घराण्याकडे आहे, सोनगावचे ग्रामस्थ तेलवण, वरातीचे निमंत्रण देतात ,धाटाव गावातून काठी तेलवणाच्या दिवशी येते, शिवपार्वतीची प्रतिष्ठापना उत्तर काठीवर होते, वारळची काठी मंदिरासमोर उखळात उभी करतात, किल्ला व तळाघर गावातील करवला करवली ऊभे असतात, मंगलाष्टक बोलण्यासाठी धाटाव , लांढर, भुवनेश्वर,वाशी,महादेव वाडी,देवकान्हे येथील जंगम यांची परंपरा आज ही आहे.
ऐतिहासिक आणि आगला वेगळा लग्न सोहळ्याच्या वेळी सुतार भगत महादेवाची मूर्ती मांडीवर घेउन विवाह सोहळ्यास बसतात, नवरी कडील धाटाव व नवरदेवाकडील मंडळी व वरसगाव ची मंडळी,पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच बहुसंख्येने कोळी बांधव आणि असंख्ये यात्रेकरु शिवभक्तगण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी निघणाऱ्या मानाच्या देवकाठ्यांची पूजा मंत्री ना.अदितीताई तटकरे,कार्यसम्राट माजी आ. तथा युवा नेते अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आली.या प्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष मधुकर शेठ पाटील, रोहा पंचायत समिती उपसभापती संजय मांडुळस्कर, पंचायत समिती सदस्य सुरेश मगर,रोहा तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पशिलकर, विजयराव मोरे, संदीपशेठ तटकरे, शंकरराव भगत, अनिल भगत,ज्ञानेश्वर साळुंके, हरिश्चंद्र मोरे, विठ्ठल मोरे, संतोष माने, हरिश्चंद्र माने, संदेश मोरे,गुणाजी पोटफोडे, मनोज कुमार शिंदे, अमित मोहिते,तळाघरचे सरपंच नथुराम माने, दिनेश रटाटे लीलाधर मोरे,दगडु बामुगडे, दत्ता चव्हाण, संतोष माने,दिनेश भगत, दिनेश रटाटे ,सौ दीपिका भगत, तळाघर, वाशी,धाटाव,किल्ला, रोठ येथील सरपंच व सदस्य, तसेच लक्ष्मण स्वामी जंगम, प्रकाशस्वामी जंगम,यांसह आदी काठीचे मानकरी तसेच परिसरातील नागरिक,बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर लग्न सोहळ्यास रोहा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मारुती पाटील,उपस्थीत होते. यात्रेत काठी नाचवण्याची परंपरा आहे, तालुक्यासह जिल्ह्याच्या अन्य तालुक्यातून भव्य दिव्य आशा सजवून उंच देवकाठया येतात, त्या लग्न समारंभ होताच खालू बाजासनई वाद्य ढोल ताशांच्या गजरात तसेच वाजत गाजत नाचवून आनंद लुटला तर लग्न सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मोठी यात्रा भरते यात्रेस मोठया प्रमाणात गर्दी असते, लग्न सोहळ्यास यात्रेस नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच राम नवमीला दुपारी तिर्थासाठी यात्रेकरूंची तसेच भक्तगणांनी उसळलेली अलोट गर्दी पाहवयास मिळाली.
याठिकाणी काव्या नाचवण्याचा प्रकार हा अतिशय विहंगमय असतो तसेच काठीसाबोत गाणी आणि ढोलताशे.तर यात्रेकरूना करमणूक म्हणून आकाश पाळणे ,मौत का कुंवा मोटर सायकल, लहान मुलांसाठी आकर्षित विविध जेम्स आणि खेळ,मिठाईची दुकाने , हॉटेल्स , आयस्क्रिम ,लहान मुलांची खेळणी चा बाजार मोठ्या प्रमाणात, वस्तु ,तर लहान मुलांच्या करमणूक साधने अधिक त्यामुळे चिमुकल्यांनी मोठा आनंद लुटला अशा विविध प्रकारची रेलचेल सुरु होती.खालुवाजाच्या सनई,तसेच ढोल ताशांच्या निनादात सुरू असलेल्या काठ्यांच्या भव्य मिरवणुकीने उपस्थित भाविकांबरोबर लहानग्यांचा आनंद काही औरच असल्याचे दिसले. राम नवमी तथा राम जन्मोउत्सव निमित्त २ दिवस भरलेल्या या यात्रेत लाखोंची उलाढाल होत असल्याने दिवसेंदिवस या यात्रेची व्याप्ती वाढतच आहे.म्हसळा श्रीवर्धन मुरुड , तळा , रोहा तालुक्यातील बहुजन समाजाला सामावून घेणारा हा रामनवमी उत्सव म्हणजे एकात्मीकतेचे प्रतीक असल्याची भावना अनेकांच्या मुखातून एकव्यास मिळत होते .
परंपरेचा ऐतिहासिक सोहळा श्री महादेवाचे लग्न आणि दोन दिवस यात्रा उत्सव आनंदाने साजरा केला जात आहे. या निमित्ताने श्री शंभू महादेवाचे मंदिर परिसरात कणा रांगोळी फुलांची सजावट तसेच विविध विद्युत् रोषणाईने उजळून निघाले आहे .तर सदरच्या या उत्सव सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी प्रसंगी पंच कमिटी,परिसरातील ग्रामस्थ अधिक परिश्रम घेत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन काटेकोर पणे केला जात असून कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.

