आंबेवाडी–निवी कालवा घनकचऱ्याच्या विळख्यात; साफसफाईवर प्रश्नचिन्ह, उन्हाळ्यात पाण्याची टंचाई तीव्र
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
आंबेवाडी ते निवी कडे जाणाऱ्या रायगड पाटबंधारे विभागाच्या कालव्याला परिसरातील घनकचऱ्याने वेढा घातल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने पाण्याचा प्रवाह पूर्णपणे अडथळित झाला असून, प्रत्यक्षात साफसफाई झाली का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाढते तापमान आणि प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा भीषण उन्हाळ्यात किमान पाणी सोडावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. मात्र, प्रत्यक्षात कालव्याची अवस्था पाहता यंदाही पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे.
आंबेवाडी परिसरातून जाणाऱ्या या कालव्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी सोडले गेले नसल्याने नागरिकांनी त्याचा वापर डम्पिंग ग्राउंड म्हणून केला. परिणामी कालव्यात मोठ्या प्रमाणात घनकचरा साचला आहे. सध्या शेतकऱ्यांकडून शेतीसाठी पाणी मिळावे, यासाठी मागणी जोर धरत असून काही ठिकाणी कामे सुरू असल्याचे दिसते. मात्र ही कामे अर्धवट अवस्थेत असल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी अधिकाऱ्यांकडून आश्वासने दिली जातात, परंतु प्रत्यक्षात पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यावर्षीदेखील डिसेंबर-जानेवारी महिन्यात पाणी सोडण्यात आले नाही. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर किमान तीन महिने तरी पाणी सोडावे, अशी मागणी नागरिक आणि शेतकरी करत आहेत.
आंबेवाडीपासून पुढे संभे गावापर्यंत कालव्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने पाण्याचा मार्गच बंद झाला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
“कालवा शेतकऱ्यांसाठी तयार झाला, मात्र अनेक वर्षांपासून पाणीच मिळत नाही. शेतकरी संघटित नसल्याने ही परिस्थिती कायम आहे,” अशी खंत संभे येथील शेतकरी मिलिंद पवार यांनी व्यक्त केली.


