तळा : तळा तालुक्यातील सोलमवाडी परिसरातील नदीलगत केमिकलयुक्त द्रव्य सोडून पर्यावरण प्रदूषित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सोलमवाडी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळाने तळा तहसील प्रशासनाकडे तक्रार करून संबंधित ठिकाणी तातडीने पाहणी व चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास MH-10-CR-9253 आणि MH-23-W-3106 क्रमांकाचे केमिकलयुक्त द्रव्याने भरलेले ट्रक निगुडशेत रोडवरील वाशी व निगुडशेत हद्दीतील नदीलगतच्या परिसरात आणून उभे करण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित ठिकाणी केमिकलयुक्त द्रव्य सोडण्यात आल्याने ते नदीच्या पाण्यात मिसळले असून पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे नदीतील मासे, जलचर, पशुपक्षी तसेच परिसरातील जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, याच नदी परिसरात सोलमवाडी गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेली बोरवेल व सार्वजनिक हँडपंप आहे. त्यामुळे रासायनिक द्रव्यामुळे भूजल व पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत तळा तहसील कार्यालयाकडून संबंधित ठिकाणी पाहणी, चौकशी तसेच आवश्यक असल्यास पाण्याचे नमुने घेऊन अहवाल मागविण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती आहे. प्रशासनाच्या अहवालानंतर प्रदूषणाचे स्वरूप आणि त्यासाठी जबाबदार व्यक्ती निश्चित होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस प्रशासनही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तक्रारीसोबत फोटो, व्हिडिओ व इतर उपलब्ध पुरावेही सादर करण्यात आले आहेत.