भविष्यातील स्पर्धा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे ही काळाची गरज” – आमदार अनिकेत तटकरे
रोह्यात भाजप व भाजयुमोतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव व करिअर मार्गदर्शन सोहळा, ५२० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
कोलाड (श्याम लोखंडे) भविष्यातील स्पर्धा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना योग्य दिशा, दर्जेदार मार्गदर्शन आणि कौशल्याधारित शिक्षण उपलब्ध करून देणे ही आजच्या काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन आमदार अनिकेत तटकरे यांनी केले.
शुक्रवारी (२६ जून) रोजी भारतीय जनता पार्टी, रोहा व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने आयटीएम स्कील युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने डॉ. सी. डी. देशमुख सभागृहात आयोजित ‘गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी इयत्ता १० वी व १२ वीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवर कोकण विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार तटकरे म्हणाले की, पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणासाठी जावे लागते, अशा वेळेस विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन समुपदेशन आणि स्पर्धात्मक वातावरणाची ओळख करून देणे आवश्यक आहे. कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असूनही योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे आयएएस, आयपीएससारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. खा सुनील तटकरे यांच्या दूरदृष्टीतून आणि मंत्री आदिती टरकर यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ट्रिपल आयटीच्या माध्यमातून १६ कौशल्याधारित अभ्यासक्रम, सीबीएसई शाळा, ज्युनिअर कॉलेज, रोबोटिक्स लॅब तसेच विविध कौशल्य प्रशिक्षण उपक्रम तसेच क्रीडा क्षेत्रालाही चालना देण्यासाठी व्यायामशाळा, स्टेडियम आणि विविध क्रीडा प्रशिक्षण सुविधा उभारण्यात येत आहेत. आधुनिक व्यायामशाळा, क्रीडा संकुल तसेच डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकास घडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर समुपदेशक (कौन्सिलर) उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न राहता तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि क्रीडा क्षेत्रातही प्राविण्य मिळवावे, असे आवाहन आमदार तटकरे यांनी केले.
जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील म्हणाले की,
राज्य मंडळ आणि सीबीएसई अभ्यासक्रमात मोठी तफावत असल्याने अकरावी-बारावीच्या प्रवेशावेळी तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य मंडळातील विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. भविष्यात सीबीएसई अभ्यासक्रमाचा विस्तार होणार असल्याने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये अधिक सक्षमपणे स्पर्धा करता येईल.
खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात उभारण्यात आलेल्या आधुनिक सुविधा व विद्यार्थी विकासाच्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक करत विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात पालकांसोबतच शिक्षकांचीही भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, शिक्षकांनी अधिक समर्पितपणे विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही वैकुंठ पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले. तर यावेळी रोहा तालुका भाजप अध्यक्ष अमित घाग यांनी विद्यार्थी, पालक व शैक्षणिक संस्थांना भेडसावणाऱ्या विविध शैक्षणिक समस्यांबाबत भाजपाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्ष, शिक्षक, पालक आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असून, विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी भाजप कायम सकारात्मक भूमिका घेईल सांगितले.
यावेळी आयटीएम स्किल्स युनिव्हर्सिटीचे व्हाइस प्रेसिडेंट राकेश गोरे यांनी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आयटीएमच्या पॅरामेडिकल विभागाच्या रंजना म्हात्रे यांनी पॅरामेडिकल शिक्षण व रोजगाराच्या विविध संधींची सविस्तर माहिती दिली. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, रायगड युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष निलेश थोरे, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, शिक्षण सभापती रविंद्र चाळके, गटनेते महेंद्र गुजर, नगरसेवक रोशन चाफेकर, आयटीएम उपप्राचार्य संकेत गोरे, डॉ रंजना म्हात्रे, भाजपा तालुका अध्यक्ष अमित घाग, शहर अध्यक्ष सुमित रिसबूड, रिया कासार, नरेश कोकरे, हाजी कोठारी, युवा मोर्चा सरचिटणीस वैभव कुळकर्णी, यांसह शिक्षक, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप नगरसेवक रोशन चाफेकर यांनी केले.