महावितरणचा भोंगळ कारभार ? वीजपुरवठा खंडित असतानाही विद्युत खांबावर काम करणारा कर्मचारी विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी, सर्वत्र संतापाची लाट.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
रोहा (प्रतिनिधी) रोहा तालुक्यासह परिसरातील काही भागांचा मंगळवारी तांत्रिक कामासाठी विद्युत मंडळाकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची पूर्वसूचना महावितरणकडून देण्यात आली होती. मात्र वीजपुरवठा खंडित करून विद्युत खांबावर तांत्रिक काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसल्याची गंभीर घटना रोहा शहरात घडली. या दुर्घटनेत संबंधित कर्मचारी खाली कोसळून गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रोहा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून, प्रकृती गंभीर असल्याने अधिक पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथे हलविण्यात आल्याची समजते. या घटनेमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर असल्याचे चित्र समोर आले असून या घडल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
रोहा शहरातील एका इमारतीच्या आवारातील विद्युत पोलवर काम करत असताना महावितरणचा कर्मचारी पंकज मढवी (रा. निडी, नागोठणे) याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी रोहा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पंकज मढवी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई येथे हलविण्यात आले.महावितरणच्या वीजपुरवठा व्यवस्थेवर या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वीजपुरवठा खंडित असल्याची खात्री करूनच कर्मचाऱ्यांना विद्युत पोलवर काम करण्यास पाठविले जाते. मात्र, काम सुरू असताना अचानक वीजप्रवाह आल्याने कर्मचाऱ्याला विजेचा धक्का बसला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याच्या प्रक्रियेत किंवा सुरक्षा यंत्रणेत नेमकी कुठे त्रुटी राहिली, याची चौकशी होणे गरजेचे आहे. विद्युत पोलवर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आधुनिक सुरक्षा साधने, योग्य प्रतिबंधात्मक उपाय आणि काटेकोर कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो का, असा सवाल आता या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याला विजेचा धक्का नेमका कोणत्या कारणामुळे बसला, विद्युत वाहिनीतील वीजप्रवाह पुन्हा कसा सुरू झाला आणि काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक सुरक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.या घटनेची महावितरण प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महावितरणचे संबंधित अधिकाऱ्यांशी अधिकृत चर्चा झाली नसल्याचे समोर आले. तसेच संबंधित ठेकेदारही अद्याप चर्चेसाठी उपस्थित झालेला नाही. जखमी कर्मचाऱ्याच्या गावातील नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला; मात्र अद्याप कोणतीही ठोस चर्चा किंवा आर्थिक मदतीबाबत निर्णय झालेला नाही.
संबंधित कर्मचारी सध्या ऐरोली येथील बर्न नॅशनल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहे. मात्र, त्याच्यावर आवश्यक ते उपचार अपेक्षित पद्धतीने होत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च कोण उचलणार, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
जखमी कर्मचाऱ्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून, त्याच्या कुटुंबाकडे पुढील उपचाराचा खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत महावितरण प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराने तातडीने पुढाकार घेऊन कर्मचाऱ्याच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी तसेच कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
कर्मचाऱ्याच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता, उपचारामध्ये कोणताही विलंब होऊ नये आणि त्याला आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार तातडीने मिळावेत, यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे.
अशी मागणी आता जोर धरत आहे.