अमृत भारत स्टेशन योजनेत रोहा रेल्वे स्थानकाचा समावेश करा; खासदार सुनील तटकरे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री सुनील तटकरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून रोहा रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश करून त्याचा सर्वांगीण पुनर्विकास करण्याची मागणी केली आहे.
२१ जुलै २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रात खासदार तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरण आणि पुनर्विकासाच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. “विरासत भी, विकास भी” या संकल्पनेवर आधारित ही योजना प्रवाशांना आधुनिक सुविधा, आकर्षक वास्तुरचना आणि दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पत्रात तटकरे यांनी म्हटले आहे की, रोहा हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांचे जन्मस्थान असून, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे मार्गावरील हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. धाटाव एमआयडीसी, नागोठणे येथील रिलायन्स उद्योगसमूह तसेच परिसरातील वाढती औद्योगिक व व्यावसायिक उलाढाल यामुळे रोहा रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मात्र, वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत स्थानकावरील विद्यमान सुविधा, पायाभूत व्यवस्था, जागा आणि बाह्य परिसर अपुरे पडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे. त्यामुळे स्थानकाचा अंतर्गत व बाह्य भाग, इमारतीचे सुशोभीकरण, आधुनिक प्रवासी सुविधा आणि संपूर्ण परिसराचा पुनर्विकास करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
तटकरे यांनी रेल्वेमंत्र्यांना रोहा रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत तातडीने समावेश करून, बारामती रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी विनंती केली आहे.
या मागणीमुळे रोहा रेल्वे स्थानकाचा कायापालट होऊन प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील तसेच रायगड जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.