ग्राहकांच्या संयमाचा अंत पाहणार का?
चिखल, दुर्गंधी आणि पावसात भारत गॅस एजन्सीसमोर नागरिकांची परवड; प्रशासनाकडून कारवाईचे संकेत
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
रोहा शहरासह परिसरातील अनेक गावांमधून भारत गॅस एजन्सीच्या सेवेसाठी येणाऱ्या ग्राहकांना सध्या अक्षरशः हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एजन्सी परिसरात निर्माण झालेल्या चिखल, अस्वच्छता आणि अपुऱ्या सुविधांमुळे ग्राहकांच्या संयमाची परीक्षा पाहिली जात असल्याचे चित्र समोर आले आहे.
दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक असलेल्या गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना लांबलचक रांगा लावाव्या लागत आहेत. मात्र एजन्सी परिसरातील चिखलमय रस्ते, साचलेले पाणी आणि दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेकांना नाकावर रुमाल धरून तासन्तास उभे राहण्याची वेळ येत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
एजन्सीच्या मागील बाजूस पसरलेल्या घाणीमुळे परिसराचे आरोग्यदायी वातावरण बिघडले असून, पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. “गॅस घेण्यासाठी आलो की त्रास हमखास ठरलेलाच,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही ग्राहकांनी दिली.
ग्राहकांच्या मते, गॅस वितरणासारख्या अत्यावश्यक सेवेसाठी येणाऱ्या नागरिकांना किमान स्वच्छ व सुरक्षित परिसर, पावसापासून संरक्षणासाठी निवारा शेड, बसण्याची व्यवस्था आणि चिखलमुक्त मार्ग उपलब्ध करून देणे ही एजन्सीची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती याच्या नेमकी उलट असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या गंभीर बाबीची दखल घेत तालुका पुरवठा अधिकारी हेमलता कुरसुगे यांनी संबंधित एजन्सीला ग्राहकांची गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक सूचना दिल्या जाणार असल्याचे सांगितले. परिसराची स्वच्छता, पावसाळ्यातील संरक्षणासाठी शेड उभारणे तसेच ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत एजन्सीला निर्देश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यामुळे आता संबंधित एजन्सी आणि जबाबदार यंत्रणा प्रत्यक्षात किती तत्परता दाखवतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अन्यथा वाढत्या गैरसोयीमुळे ग्राहकांच्या नाराजीचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू असलेल्या सेवाच जर त्रासदायक ठरत असतील, तर त्याकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करणे काळाची गरज बनली आहे.
“ग्राहकांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि सुलभ सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे; त्यासाठी संबंधितांनी त्वरित पावले उचलावीत,” अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे.


