विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ‘सुधा सितारा’ उपक्रम स्तुत्य
– मंत्री अदिती तटकरे यांचे प्रतिपादन;
सुदर्शन केमिकलतर्फे ५०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते):
आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा ‘सुधा सितारा’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी उभारी मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.
रोहा येथील चिंतामणराव देशमुख सभागृहात सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजच्या ‘सुधा’ सीएसआर उपक्रमांतर्गत आयोजित शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी रायगड जिल्ह्यातील ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाला रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, तहसीलदार किशोर देशमुख, पोलीस निरीक्षक सुयश सिंह तसेच सुदर्शन केमिकल्सचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, सुदर्शन कंपनीने गेल्या सहा वर्षांत जवळपास एक हजार विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला आहे. गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आर्थिक मदत व मार्गदर्शन देण्याची संकल्पना कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे विशेषतः मुलींचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत आहे.
करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडी-निवडी ओळखून निर्णय घ्यावा, तसेच कठोर परिश्रम, सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देत, जिद्द, सातत्य आणि संयम या गुणांमुळेच यश मिळते, असे सांगितले. नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी पालकांच्या पाठिंब्याचे महत्त्व अधोरेखित करत समाजसेवेची जाणीव जपण्याचे आवाहन केले.
सुदर्शन केमिकल्सच्या अधिकाऱ्यांनी ‘सुधा’ सीएसआर उपक्रमांतर्गत शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण या क्षेत्रांत सातत्याने काम सुरू असल्याचे सांगितले. ‘सुधा सितारा’ उपक्रमाची व्याप्ती यंदा संपूर्ण रायगड जिल्ह्यात वाढवण्यात आल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात याआधी शिष्यवृत्ती लाभलेल्या विद्यार्थिनींच्या यशोगाथांनी उपस्थितांना प्रेरित केले. यावेळी ‘आदिशक्ती’ व ‘सु-उमेद’ या माहितीपुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कचरे यांनी केले तर रवी दिघे व पराग फुकणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सहकाऱ्यांनी विशेष योगदान दिले.


