दमखाडी नाल्याच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही!
३० जुलैच्या दुर्घटनेनंतरही काम रखडले; गणेशोत्सव तोंडावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते
रोहा शहरातील दमखाडी नाक्याजवळील जयराम अपार्टमेंट परिसरात ३० जुलै रोजी रात्री नाल्यावरील स्लॅब अचानक कोसळून तब्बल आठ वाहने नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दुर्घटनेत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र, दुर्घटनेला बराच कालावधी उलटूनही नाल्याच्या दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
घटनेनंतर रोहा नगराध्यक्षा वनश्री शेंडगे आणि मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी नगरसेवक रवी चाळके, महेंद्र गुजर, अजित मोरे, रोशन चाफेकर, अहमद दर्जी, संजना शिंदे, अरबाज मनीयार यांच्यासह नागरिक उपस्थित होते. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. मात्र, पाहणी आणि आश्वासनांनंतर प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम कुठपर्यंत पोहोचले, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दमखाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर दुकाने, गाळे आणि नागरिकांची वस्ती आहे. त्यामुळे नाल्याची दुरवस्था आणि दुर्घटनेनंतरची परिस्थिती स्थानिकांच्या दैनंदिन व्यवहारासाठी डोकेदुखी ठरत आहे. दुर्घटनेत काही दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाले असून, आता गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या परिसरातील वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील पवार यांनी सांगितले की, नाल्याच्या कामासंदर्भात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर बैठक झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन ते तीन दिवसांत काम सुरू करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
मात्र, ‘दोन-तीन दिवसांत काम सुरू होईल’ या आश्वासनानंतर प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. गणेशोत्सव काळात या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ वाढणार असून, वाहतूक कोंडी अथवा दुर्घटना घडल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
सदर नाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असल्याने त्याची दुरुस्ती, सुरक्षितता आणि आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. त्यामुळे आता केवळ आश्वासने न देता तातडीने प्रत्यक्ष काम सुरू करून ते दर्जेदार आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत राहावी, नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी आणि स्थानिक दुकानदारांचे आणखी नुकसान होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर काम हाती घेण्याची गरज आहे. ३० जुलैच्या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र आता प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांचा संयम सुटण्याची वेळ आली आहे. ‘काम सुरू होणार’ या आश्वासनापेक्षा ‘काम सुरू झाले’ हे पाहण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.