बोरघर येथे काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
“समाजासाठी झटणारी मूठभर माणसेच परिवर्तन घडवतात.” — राजेंद्र जाधव
प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव चणेरा
रोहा तालुक्यातील बोरघर गावातील श्री काळभैरव मंदिर परिसरात भाविक, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या सोयीसाठी सीएसआर (CSR) निधीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बाकड्यांचे लोकार्पण रविवारी ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक राजेंद्र जाधव यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
गावातील प्रणित भगत व काळभैरव युवक मंडळ यांनी मंदिर परिसरात भाविकांना बसण्यासाठी बाकड्यांची आवश्यकता असल्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जितेंद्र जाधव यांच्याकडे केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत जितेंद्र जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत सीएसआरच्या माध्यमातून बाकड्यांची उपलब्धता करून दिली. त्यामुळे मंदिर परिसरात येणारे भाविक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार महेंद्र मोरे, तालुका क्रीडा समन्वय अधिकारी तथा रोहा प्रेस क्लबचे सचिव रवींद्र कानेकर, ज्येष्ठ नागरिक अर्जुन भगत, उद्धव आव्हाड, प्रणित भगत, काळभैरव युवक मंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संपादक राजेंद्र जाधव यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधताना समाजकार्यात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. “समाजात परिवर्तन घडविण्यासाठी मोठ्या संख्येची नव्हे, तर समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या मूठभर लोकांची गरज असते. युवकांनी केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता गाव, समाज आणि राष्ट्राच्या विकासातही योगदान देण्याची भावना जोपासली पाहिजे. शिक्षण, क्रीडा, उद्योग, पत्रकारिता, प्रशासन किंवा कोणतेही क्षेत्र असो, प्रामाणिकपणा, जिद्द आणि सातत्य यांच्या जोरावर यश निश्चित मिळते. प्रत्येक युवकाने आपल्या आई-वडिलांचे, गावाचे आणि जिल्ह्याचे नाव अभिमानाने उंचावेल असे कार्य करावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले. तर
तालुका क्रीडा समन्वय अधिकारी तथा रोहा प्रेस क्लबचे सचिव रवींद्र कानेकर यांनीही विद्यार्थी व युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. “आज अनेक तरुण इतर जिल्ह्यांतून रायगडमध्ये येऊन आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करत आहेत. मग आपल्या गावातील युवक कोणत्याही बाबतीत कमी नाहीत. त्यांनी दर्जेदार शिक्षण घेत क्रीडा, हॉटेल व्यवस्थापन, उद्योग, कौशल्य विकास तसेच विविध शासकीय भरतीच्या संधींसाठी स्वतःला तयार केले पाहिजे. मेहनत, शिस्त आणि सातत्य या तीन गोष्टी अंगीकारल्या तर यश निश्चित मिळते,” असे ते म्हणाले.
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जाधव यांनी गावाच्या विकासासाठी आणि सार्वजनिक सुविधांच्या उभारणीसाठी भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. समाजातील गरज ओळखून लोकसहभागातून विकासाची कामे उभी राहिली तर गावाचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . कार्यक्रमाच्या शेवटी प्रणित भगत, काळभैरव युवक मंडळ तसेच ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जाधव यांचे विशेष आभार मानण्यात आले. गावाच्या विकासासाठी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली

